पंचाहत्तरीची
उमर गाठली ...
गेल्या
वर्षभरापासून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा जयघोष आपण करतो आहोत. पाहता
पाहता ऑगस्ट महिना आला आणि १५ ऑगस्टही लवकरच येईल. सहजच वाटले, अमृतमहोत्सवाच्या
निमित्ताने आपण आपल्याला काय वाटते यावर वारेमाप बोलतो. जिच्यासाठी जयघोष करतो
आहोत त्या भारतमातेला काय वाटत असेल, याचा विचारही नाही केला. साहजिकच भूमातेचा
विचार करणारे, मन जाणून घेणारे कितीतरी साहित्य डोळ्यांसामोरून
झरकन येऊन गेले. कवी कुसुमाग्रजांजवळ मन रेंगाळले. मन थेट २५ वर्षे मागे गेले. आणि
आठवली त्यांची अवघी कविता -
पन्नाशीची
उमर गाठली अभिवादन मज करू नका
मीच
विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका
‘स्वातंत्र्यदेवतेची
विनवणी’ या कवितेतून मातृभूमीचे मनोगत कवी कुसुमाग्रजांनी व्यक्त केलेले आहे. अनेक
सरकारी कार्यालयांमधील आणि शाळांमधील भिंतींनी प्रदीर्घकाळ ही कविता मोठ्या मानाने
मिरवली. मला वाटते ही कविता मनामनात झिरपून आचरणातून प्रतिबिंबित होईपर्यंत फक्त
वयाचा पहिला आकडा बदलता ठेवला तरी ही कविता काळाशी सातत्याने जवळीकतेचे नाते सांगत
राहील. ‘फटका’ या काव्यप्रकारात १९९६ मध्ये रचलेले हे काव्य मातृभूमीचे हृदगत
व्यक्त करणारे आहे. सभोवतीची परिस्थिती पाहून मातेचे हृदय हेलावून
जाते. जाता – येता वंदन करणाऱ्या भारतीय मनास तीच हात जोडून प्रार्थना करते,
स्वत्वाची आठवण जागवते, “सूर्यकूलाचा, तेजाचा वारसा लाभलेल्यांनी प्रकाशाचेच पूजक
झाले पाहिजे. अंधाराची पूजा करून कुलधर्माशी प्रतारणा त्यांनी करू नये.” मुळातच
भारत प्रकाशात रत असणारा देश आहे. हा प्रकाश ज्ञानाचा, पावित्र्याचा, मांगल्याचा,
सौहार्दाचा; तो जोपासला पाहीजे.
‘धर्म’ या
संकल्पनेला मध्यवर्ती स्थान देणारी आपली संस्कृती शास्त्रोपासक आहे. चिकित्सक
वृत्तीतून, प्रयोगशील प्रवृत्तीतून हाती आलेले अनुभवजन्य ज्ञान लोकभाषेतून,
प्रचलित संकल्पनांमधून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवले गेले. परंपरेच्या
संचितातून ते प्रवाहीत होत राहिले. या संचिताच्या मुळाशी जाऊन त्याचा कालानुरूप
अर्थ समजावून घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्याच्या अभावी जीवनसंस्कृतीविषयी अज्ञान,
भय निर्माण होते. अशा अवस्थेत संस्कृतीचा, देशाचा वृथा अभिमान बाळगणे अधिक घातक
ठरते. आंधळेपणाने केलेले रूढी-प्रथा-परंपरांचे पालन समाजाला अधोगतीकडे नेते. बदल,
परिवर्तन होणे, जुन्याच्या जागी नवे येणे या नैसर्गिक प्रक्रिया आहेत. त्या खुल्या
मनाने आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजेत. भूतकाळाबद्दल गळे काढत बसण्यापेक्षा भविष्याकडे
डोळस व आश्वासक वाटचाल केली पाहिजे.
त्यासाठी आपली
कामे, आपल्या जबाबदाऱ्या उत्तमपणे सांभाळता आल्या पाहिजेत, हे सांगताना
वेतन
खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
इतक्या साध्या सोप्या शब्दात ‘देशद्रोहा’ची आलेली व्याख्या माणसाला
अधिक सजग करून जाते. देशद्रोह, दहशतवाद, अन्याय, अत्याचार असे शब्द समोर आले की
‘आपण नाही बाबा त्यातले’, अशी सामान्य माणूस स्वत:ची समजूत करून घेतो. वास्तविक
पाहता ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार’ अशी प्रथा जिथे विकसित होते, तिथे आपपत: वरील
सर्व दुर्गुण कळत-नकळत मूळ धरायला लागतात. भारतीय संस्कृतीत ‘राजा हा प्रजेचा
सेवक’, ‘राजेपद जनसेवेसाठी’ या धारणा प्रमाण मानल्या गेलेल्या आहेत. तिथे
जनसेवेस्तव
असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा।
अशी आठवण
भारतमातेला द्यावी लागते, याचा आपण प्रगत समाज म्हणवून घेताना गांभीर्याने विचार
केला पाहिजे.
समाजाचे
नेतृत्व, प्रतिनिधित्व करणाऱ्यांचे, आपल्याला आदर्शवत वाटणाऱ्या माणसांचे प्रेरणादायीत्वाची
खूण म्हणून आपण पुतळे उभारतो. पण एकदा पुतळे उभारून झाले की प्रेरणा कधी संपुष्टात
येते, आणि केवळ एखाद्या पत्त्याच्या खुणेसाठी त्यांचा वापर केंव्हा व्हायला लागतो,
हे आपल्यालाही कळत नाही. तिच्या वीरपुत्रांचे अशा पद्धतीने उभारलेले पुतळे म्हणजे
भारतमातेला त्यांची विटंबना वाटते. पुतळ्यांना हार-फुलं वाहून, शब्दबंबाळ भाषणे
करून त्यांचे वांझ गोडवे गाण्यापेक्षा कणभर तरी त्यांचा मार्ग अनुसरावा; ज्यामुळे
देशाचे आणि मानवतेचे भले होऊ शकेल अशी रास्त आणि स्पष्ट अपेक्षा भारतमाता व्यक्त
करते.
त्याही
पुढे जाऊन धोक्याची सूचना ती देते, स्वातंत्र्याच्या काळात ज्या सत्तेच्या जोरावर
आपण नानाविध निर्णय घेतो ती सत्ता दुधारी आहे. ही सत्ता जनकल्याणासाठी वापरली गेली
तर ती अमृतासारखी तारक आहे. मात्र त्या सत्तेची नशा चढली तर ती मदिरेसारखी मादक होण्यास
वेळ लागत नाही. आपले कामाचे ठिकाण मंदिरासारखे पवित्र असावे. त्या मंदिराचे मदिरालय
होऊ देऊ नका. कर्मयोगाची आठवण आपली मातृभूमी आपल्याला देते, त्या आठवणीशी इमान
राखता आले पाहिजे.व्यवस्थेला केवळ नावे ठेवण्यापेक्षा प्रकाश पेरला पाहिजे, दिव्याने
दिवा लावला पाहिजे. कुठेही काही चांगले घडताना दिसले की त्यातील उणे-दुणे न काढता
शक्य ती मदत करावी. गोर-गरीबांना छळणे, गुणी माणसांवर जळणे, कोणाचे दोष दिसताच
त्याची चार-चौघात वाच्यता करत राहणे या बाबी टाळल्या पाहिजेत.
कुसुमाग्रजांचा
हा ‘फटका’ व्यावहारिक जीवनात कसे वागावे, हे सांगतानाच आपल्या भाषेप्रती आपली
संवेदनशीलता कशी असावी, संस्कृती जोपासण्यासाठीचे आपले भाषिक कर्तव्य काय, हे
स्पष्टपणे सांगतो. माणसाने बहुभाषिक व्हावे, पण त्यासाठी मातृभाषेची उपेक्षा
करण्याचे कारण नाही. भाषा-विचार-कृती यातून संस्कृती आकाराला येते.
भाषा
मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम
भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका
आजही आमच्या मुलांना कोणत्या
भाषेतून शिक्षण द्यावे, या संभ्रमात असणाऱ्या आम्हा लोकांना मातृभूमी, मातृभाषेचे
मोल फार चपखलपणाने सांगते. मुळामध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची व तो अभिव्यक्त करण्याची
क्षमता मातृभाषेतील शिक्षणाने विकसित होते. ज्याची मातृभाषा पक्की तो अन्य भाषा सहजतेने
शिकू शकतो. भाषेचा अभ्यास अवांतर वाचनाची ओढ निर्माण करतो. प्रगल्भ वाचनातून संस्कृतीच्या
समृद्धतेची दारे साहित्य आपसूक खुले करून देते.
वाचता वाचता मनुष्य आपसूक लिहिता होतो, लिहिणाऱ्याला कुसुमाग्रजांनी
मोठं छान सावध केले आहे. ते म्हणतात हाती लेखणी आली म्हणून वर्षभर शिमग्याचा सण साजरा
करू नये. आवश्यक टीका – टिपण्णी जरूर करावी पण त्यातूनही काही विधायक घडावे. विघातक
टीकेने विध्वंसापलीकडे फार काही साधता येत नाही. अपप्रवृत्तींचा मात्र तीव्र निषेध
करत त्या मुळापासून उखडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. या कठीण वाटेवर धैर्याने चालावे
लागते. वाट सुकर व्हावी यासाठी चुकीचे आणि नकारात्मक कार्य करणाऱ्यांशी नाते जोडून
चालत नाही तद्वतच समृद्धीकडे पाठ फिरवून बैरागीपण स्वीकारणेही योग्य नव्हे. प्रामाणिक
कष्टांनी ही समृद्धी समाधानासह मिळवता आली पाहिजे. आपले समाधान दुसऱ्याला वाटता आले
पाहिजे. द्वेष-मत्सरातून इतरांची घरे उद्ध्वस्त करून स्वत:चे घर उभारता येत नाही आणि
उभारु नये. आपण सज्जन असावे पण ही सज्जनता दुबळी नसावी. दुर्जनांना योग्य तो धडा शिकवण्याचे
बळ आपण अंगी बाळगले पाहिजे. त्यासाठी तरुणाईचे बळही एखाद्या वृक्षाप्रमाणे वाढवावे.
जे स्वत:च्या जोमाने वाढू शकेल व कालानुरूप नित्यनूतनता धारण करेल.
राष्ट्रीय एकात्मतेच्या, समानतेच्या गप्पा मारत प्रत्यक्ष जीवनामध्ये
जातिभेद, उच्च-नीचता मानणे अयोग्य आहे. आवश्यकतेनुसार कायदे केलेच पाहिजेत पण जातिभेदाचे
हे विष माणसांच्या अंतरंगातून बाहेर पडायला हवे. स्त्री-पुरुष समतेचे गोडवे गाताना
तिला माणूस म्हणून वागवणे अत्यावश्यक आहे.
समान मानव
माना स्त्री तिची अस्मिता खुडू नका।
दासी म्हणुनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।
अशा मार्मिक शब्दांमध्ये समाजाची
मानसिकता कवी अधोरेखित करतात.
नास्तिक असावे की आस्तिक हा वैयक्तिक प्रश्न आहे पण कसेही असलात तरी
माणुसकीतला देव पाहता, जाणता आणि जोपासता आला पाहिजे.
माणुस
म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे।
नर नारायण तोच असे।
या शेवटच्या
कडव्यामध्ये संस्कृतीचा सारांश व्यक्त होताना दिसतो. आध्यात्मिकता हा भारताचा स्वभाव.
वानर – नर - नारायण ही मानवी विकासाची क्षमता संस्कृतीने व्यक्त केलेली आहे. व्यक्तिगत
जीवनात आध्यात्मिक पातळ्यांचे विविध स्तर गाठत माणूस प्रगतिपथावर जाऊ शकतो. सामूहिक
जीवनात मात्र जो अंत:करणातून माणसाला समत्वाने आणि ममत्वाने वागवू शकेल तोच नारायण
पदापर्यंत जाऊ शकतो. भारतमातेला स्वतंत्र करताना केवळ तिचे राजकीय स्वातंत्र्य वीर-हुतात्म्यांना
अभिप्रेत नव्हते, याचे भान सार्वजनिक जीवनात आम्ही जोपासले पाहिजे. स्वातंत्र्याचे
राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानसिक, सांस्कृतिक हे सर्व पैलू स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी
वर्षामध्ये तरी आपण समजाऊन घ्यावेत. त्याचे प्रतिबिंब आपल्या दैनंदिन जीवनातून व्यक्त
व्हावे. ते होत नाही म्हणूनच तर मायमाऊली आपल्याला कळकळीने सांगते
लाख
लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरु नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरु नका।।
स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवी वर्षात, क्रांतिदिनाच्या निमित्ताने ही वर्तनक्रांती घडवून आणण्याची प्रेरणा
सामान्य माणसाने जोपासली तर ‘स्वराज्य महोत्सव’ व ‘हर घर तिरंगा’ हे अभियान अधिक अर्थपूर्ण
होईल. कदाचित मातृभूमीचे हेच मागणे असावे.
प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय.

